Friday 10 September 2021

हतगड किल्ला विषयी माहिती

हतगड किल्ला, सापुतारा जवळ , नाशिक

हतगड किल्ला .....

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीदरम्यान जिंकलेला "हतगड"  सुंदर अन् ऐतिहासिक किल्ला आहे. नाशिकहून सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच "हतगड" . हतगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे हद्दीवरचा गड आणि हस्तगिरी असेही म्हटले जाते. हा गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्किद १३०० ते १७०० अशी आहे. तर रूद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हतगडावरील शके १४६९ (सन १५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी" हतगड" निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसतो. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्यांपैकी एक. दख्खनच्या मोहिमेसाठी शके १५८५ (सन १६६३) मध्ये सुरगणा परिसरात पाठविले होते. यावेळी हतगड किल्ला आदिलशाहाचा सुभेदार शुराबखान हा किल्लेदार होता. गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला शके १५८६ (सन १६६३) मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला होता. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हतगड परिसरातील बारा गावांची देशमुखी दिली होती. दिल्लीच्या अकबर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल यांचा मुलगा हसन अली याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी स्वारी केली. त्यावेळी किल्लेदार गंगाजी मोरे या किल्लेदाराने निकराचा लढा दिला. मात्र मोरेंचा पराजय झाला. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ रोजी हतगडची सोन्याची प्रतिकृत चिन्ह सादर केली होती. यावेळी बादशहाने हसनअलीला ‘खान’ ही पदवी बहाल केली. हतगडच्या पायथ्याशी गंगाजी मोरे या किल्लेदाराची समाधीही आहे. हतगडचे चढन अगदी सोपे असून, वरपर्यंत गाडी जाते. हतगडचे प्रवेशद्वार, शिलालेख व गडावरील इमारतींचे अवशेष तसेच धान्य कोठारे व पाण्याचे टाके पाहण्यासारखे आहेत..

No comments:

Post a Comment